अर्जुनाचा विषाद ऐकून प्रथम श्रीकृष्ण म्हणतात, एका प्रगतशील मूल्यांचे ज्ञान असणाऱ्या मनुष्याला असा विचार शोभत नाही. हा नामर्दपणा आहे! हे मानसिक दुबळेपण आहे..! आणि ह्या गोष्टी मनुष्याच्या दुष्कीर्तीस कारणीभूत होतात..! हे ऐकून अर्जुन द्विधा मनस्थितीत म्हणतो स्वकीयांच्या रक्ताने हे हात माखलेले चांगले दिसणार नाहीत, याने कोणता धर्म साध्य होणार आहे? अशांत झालेला अर्जुन भगवंताकडे याचना करतो की "मला उपदेश करा"
भगवंत उत्तरादाखल म्हणतात, हा शोक व्यर्थ आहे कारण ज्ञानी लोक जिवंत अथवा मेलेल्यांच्या बद्दल शोक व्यक्त करत नाहीत. कारण अश्या लोकांना आत्मा आणि भौतिक देह यातील फरक माहिती असतो, आत्मा हा निरंतन व शाश्वत आहे याचे ज्ञान असते! म्हणूनच भगवान म्हणतात,' ज्याकाळी मी, तू व हे राजे नव्हते असा काळ कधीही नव्हता आणि यापुढे होणार नाही असाही कोणता काळ नाही..!'
भगवंत पुढे म्हणतात, मनुष्य गुणकर्माने बाध्य असतो आणि म्हणूनच कर्मबंधनातून मुक्तता हे मनुष्य ध्येय आहे. म्हणूनच कोणत्याही फळाची, आसक्तीची अपेक्षा न ठेवता कर्म करणे हेच योग्य होय! जो जन्मला आहे त्याला मृत्यू आहे. पण म्हणून कर्तव्य कर्माचे पालन टाळणे योग्य नाही! आत्मा हा अमर्त्य असल्याने शोक करण्याची आवश्यकता नाही..! म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, क्षत्रिय म्हणून जे तुझे कर्तव्य आहे तोच तुझा धर्म आहे त्याचे पालन हाच मोक्षप्राप्ती देणारा मार्ग आहे. सर्व चांगल्या अथवा वाईट कर्माच्या बंधनातून मुक्तता हाच योग आहे!