मराठी विनोदी साहित्याचा तिसरा आधारस्तंभ: पु ल देशपांडे




    दगड आणला, छिन्नीचे घाव घातले म्हणून मूर्ती पूर्ण होत नाही. नक्षीकामाची कल्पकता त्यामागे असावी लागते. ही कल्पकता त्या मूर्तीला संगमरवरी शलाकेचा साज आणून देते. वरवर कोरलेल्या नक्षीकामाचे साक्षीदार चांगले आतवर जाऊन त्यात प्राण आल्याची साक्ष देतात. तीच साक्ष मराठी जनतेने पु ल देशपांडेंच्या अभिवादनाला दिली. ‘शब्दांनी शब्दांचे केले वर्णन तरीही अर्थ उरे काही!’ तसा इतके लिहून, इतके बोलून अजून ‘दशांगुळे उरला’ अस पुलंच्या बाबतीत म्हणावं लागेल. मराठी विनोदाला साहित्यिक, कलात्मक, अलंकारिक रूप सजवलं ते पुलंनी! कदाचित सरस्वतीनेच आपला एखादा दूत पाठवला असेल!

    ह्या दूताचा पहिला पदस्पर्श दिनांक ८ नोव्हेंबर १९१९ रोजी मराठी मातीला झाला, आणि त्या मातीला एक परिहासाचे नवचैतन्य मिळाले. सरस्वतीने जणू पैलू पाडलेला हिराच जन्माला घातला होता. या पैलूंचे दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला पुढील ऐंशी वर्षे हसवणार होते! पुलंचे लहानपण मुंबईत गेले. तिथेच दत्तोपंत राजोपाध्ये यांच्या कडे गायन आणि हार्मोनियम वादन शिकून घेतले. वयाच्या चौदाव्या वर्षीच बालगंधर्वांच्या समोर पेटी वाजवून त्यांची थाप पाठीवर मिळवली होती. लहानपणीच एकदा कुठेसे अत्रेंचे भाषण ऐकले आणि ते त्यांचे चाहते झाले. पुढे शिक्षणात M.A. व LLB ह्या पदव्या संपादन केल्या.

    १९४७ साली कुबेर नावाच्या एका मराठी चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहली. हे पहिले काम! नन्तर त्यांना बरेच चित्रपट मिळत गेले. काही चित्रपटात काम देखील केले. १९५३ चा गुळाचा गणपती हा शेवटचा! हा चित्रपट खूप गाजला! हा चित्रपट सबकुछ पुलं असा होता. कारण कथा, पटकथा, नायक, संगीत, दिग्दर्शन सगळं काही पुलंनी केलं होतं. या दरम्यान बरेचसे अनुभव त्यांनी मिळवले. बेळगावला महाविद्यालयात प्राध्यापकी करत तेथील रावसाहेब त्यांनी अनुभवले. असे बरेच अनुभव त्यांनी जतन केले. एक होता विदूषक (१९९२) हा पुलंनी पटकथा लिहलेला शेवटचा चित्रपट! पण पुलं घराघरात पोचले ते गुळाचा गणपती गाजल्या मुळे!

    प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात काहीतरी एक निर्णायक टप्पा असतोच. ‘बटाट्याची चाळ’ व त्याचे प्रयोग हा असाच एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा! खूप वर्षांपासून चाळीतले अनुभव पुलंनी लिहून ठेवले होते. अधून मधून महाविद्यालयात त्याचे मोघम वाचन देखील झाले होते. मात्र त्याचा पहिला एकपात्री प्रयोग मुंबईत झाला आणि रातोरात त्यांना प्रसिद्धी मिळाली. या एकपात्री प्रयोगाने तो कसा असावा याची एक मिसाल घालून दिली. आजही त्या प्रयोगाची आठवण काढली जाते. परंतु त्याचे फक्त ५० प्रयोग केले गेले. यानन्तर वाऱ्यावरची वरात, सुंदर मी होणार, तीन पैशाचा तमाशा अशी बरीच नाटके झाली. सर्वांना प्रसिद्धी मिळाली. पुन्हा असा मी आसामी ने उच्चांक मोडला. असा मी आसामी ची वाक्ये आजही अनेक तरुणांच्या तोंडी आढळतील.

    १९६५ साली ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. या जोडीला इतर उद्योग चालू होतेच. जिथे संगीताची बैठक होणार आहे तिथे ते आपली बैठक घेऊन जात. गाण्याबद्दल प्रचंड आस्था होती. एका मुलाखतीत सुद्धा साहित्या पेक्षा संगीताबद्दलची आस्था त्यांनी बोलून दाखवली आहे. कविता ऐकण्याचा व वाचण्याचा या व्यक्तीला खूप छंद. कुठेही प्रवासाला निघाले की सुनीता देशपांडे व पु ल यांच्यामध्ये कवितांच्या भेंड्या रंगत. त्या आवडत्या कवितेप्रमाणेच पु लं ची भाषा पण काव्यमय होती.

    पु लं सर्वश्रुत आहेत ते त्यांच्या कथाकथना साठी! व्यक्ती आणि वल्ली प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातले ललित खूप गाजले. यात पुलंनी बोलून दाखवलेली पात्रे खरोखरच दुनियेत कुठेतरी असावीत अस वाटतं. या पात्रांचा प्रपंच त्यांच्याच तोंडून ऐकताना तो एक वेगळाच परिहास असल्याची जाणीव होते. हसवणूक, गोळाबेरीज, खोगीरभरती, पुरचुंडी अशी बरीच पुस्तके निघाली. रावसाहेब हे खरोखर होतेच ते त्यांनी तसेच लेखणीतून जिवंत ठेवले. पण अंतू बरवा, सखाराम गटणे, हरितात्या, नारायण ह्या समाजात वावरणाऱ्या मूर्त प्रस्थांना त्यांनी खरोखरीच जिवंत केले! पाळीव प्राणी-पक्षी, बिगरी ते मॅट्रिक वगैरे कथानकातून विनोदाबरोबरच सामाजिक जाणिव घडवून दिली.

    पुलंची प्रतिभा किती होती ह्याची मोजदाद कदाचीत कोणीच नाही करू शकणार. साक्षात सरस्वती वीज बनून संचार करते की काय अस ते लिखाण! परिहासविजल्पित आणि काव्यमय लिखाण! वाक्यावाक्यातून गद्य लिहिताना त्यात विणलेली पद्य शैली दिसून येईल. यांचा सुंदर मिलाफ क्वचित कोणाला जमेल. विनोदी उपमा देण्याची कला, वाक्यात देखील यमक जुळवलेली प्रक्रिया! त्यातुन निर्माण होणारा सौंदर्यविलास हे सारंच भारावून टाकणारं! बटाट्याच्या चाळीतील एक प्रसंग आहे. भ्रमण मंडळ नुकत बोरिबंदर स्टेशन वर पोहोचतं तेंव्हा पु ल वर्णन करतात- ‘व्हिकटोरिया थांबल्या थांबल्या दसऱ्याला सोनं लुटावं तस हमालानी सामान बाहेर काढायला सुरवात केली. त्या गडबडीत काशीनाथ नाडकर्णीचा तो पेटारा एका हमालाने खेचला. त्याचा धक्का त्रिलोकेकरच्या हातात असलेल्या टिफिनला लागला. आणि सकाळी बाबली बाईंनी करून दिलेला गोडी बटाटीचा रस्सा जरासा त्रिलोकेकरांच्या पॅन्टवर आणि बराचसा बाबूकाका खरेंच्या धोतरावर सांडला. तेवढ्यात दुसऱ्या एका हमालाने तो खेचला आणि उरलेला रस्सा, उकडलेली अंडी, व तो पुलाव खाऊन बोरिबंदरचा रस्ता अगदी तृप्त झाला.’ हे इतकं बहारदार वर्णन दुसरं कोण करू शकेल? त्यांचा विनोद स्थितीपेक्षा वाक्यरचनेतुन जास्त फुलून दिसे. शब्दांची ठेवण अशी असायची की फिदीफिदी हसण्यापेक्षा स्मितहास्याची गर्दी अधिक जमे! पुलंचे विनोद मन हसवणारे होते. ते हास्य अधिककाळ रुजवून ठेवण्याची ताकद त्या विनोदाच्या मध्ये होती. त्यांचा विनोद तात्पुरता नव्हता. तो मनात घर करून बसे. मग पुढे त्याच विनोदाची आठवण येऊन मन उल्हासित होऊन जाते. शब्दांची किमया दाखवणारी कोणती तरी जादू त्यांच्याकडे असावी. प्रत्येक ठिकाणी अवस्थेप्रमाणे त्या भाषेचा रंगही बदले. ‘पानवाला’ आणि ‘नारायण’ यातली भाषा दोन्हीकडे भिन्न आहे. ‘पानवाला’ मधील विनोद त्यातल्या पानाप्रमाणेच रासनिष्पंन आणि अगम्य होऊन रंगतो. तर नारायण मध्ये त्यातील संवादशैली आणि स्थितीच्या अवस्थेतून फुलणारा परिहास बेरंगी पाण्याच्या खळखळाटाप्रमाणे रंगणारा! त्यांच्या लेखणीचे मूळ संस्कार तेच ठेऊन साहित्याचा रंग तेवढा वेगळा देण्याची त्यांची सचोटी इतर कोणी नाकारू नाही शकणार. निरनिराळ्या स्थिती वर्णन करण्यासाठी त्यांनी वेगवेगळी पात्रे निर्माण केली. त्यानुसार भाषाशैली मध्ये बदल ठेवले. काही ठिकाणी रंग एकच पण त्यांच्या छटा वेगळ्या! त्यामुळे प्रत्येक ठिकाणी भाषा व त्यातली समृद्धी वेगळी वाटे. पुलंचे लिखाण अगदी विनोदापुरतच मर्यादित होत अस नाही पण बाकी त्यांनी घेतलेल्या मुलाखती, इतर प्रवास वर्णने, लेख, कविता यात देखील त्यांचं एक निराळं रूप बघायला मिळत. पण विनोद हे मुख्य साधन! अफाट निरीक्षणशक्ती, भरपूर वाचन आणि प्रचंड लाभलेली स्मरणशक्ती ह्या तिजोरीतुन ही विनोदाची मूर्ती उभी राहिली. त्या मूर्तीच्या हातून घडलेलं व्यक्ती आणि वल्लीच साम्राज्य आज अनेक लोकांच मनोरंजन करत आहे, दुःख हलकं करत आहे. देवाने ह्या वल्लीचे जरी प्राण नेले असले तरी त्यांनी उभ्या केलेल्या वल्लींचे प्राण हरपणे त्याला नाही जमणार! मूर्तिकार गेला तरी मूर्तीच्या रुपात तो आपलं जीवन सौंदर्य मागे सोडूनच जातो!

(संपुर्ण)

मेघ-सरिता


तिकडून येते सरिता
तो मेघ न्याहाळत होता
सुकलेले पर्ण बघून
तो खाली धावून आला

भेट घडली दोघांची
साक्षीला क्षितिज होते
त्या प्रेमाची आठवण घेऊन
तो सूर्य निजून गेला

त्या संध्यासमयी
मी मुक्त छंद होतो
त्या प्रीतीच्या वेलींवर
झोके झुलवित होतो

ती प्रभा निसटून आली
या हाती, माझ्या ओठी
प्रेमाचे गीत करून वेडे
मी लाड पुरवीत होतो

ते झाले असे काही
वेलींचे व्हावे रान
रानाच्या हट्टापुढे
झुकली माझी मान.

मराठी विनोदी साहित्याचा दुसरा आधारस्तंभ: आचार्य अत्रे



    दूर वरून जणू ईश्वराने आपल्या हाताने अर्ध्य द्यावे तसे अनेक ओहोळ येतात. डोंगरांच्या अनेक कड्या कपारीतून त्यांचे पाट आपापली वाट शोधत खाली येऊ लागतात. पण ते जो पर्यंत एकत्र येत नाहीत तो पर्यंत नदीचे स्वरूप त्याला प्राप्त होत नाही. आणि ते एकत्र नसले तर तो विधात्याचा डोंगर त्यांना कधी खाऊन टाकतो हे त्यांनाही कळत नाही. विनोदाचे अर्ध्य गडकरी मास्तरांनी सोडले खरे; पण त्याला दिशा दिली नव्हती. जमिनीत रोवलेलं हे रोप सूर्याच्या कोणत्या दिशेने जाईल हे अजून ठरले नव्हते. त्या रोपाला योग्य दिशा द्यायचं काम केलं ते म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी!
    विनोदाचा पुतळा असलेल्या ह्या अवलिया व्यक्तीचा जन्म दिनांक १३ ऑगस्ट १८९८ रोजी सासवड येथे झाला. कलेचा गुण कुठून तरी रक्तात येतो म्हणतात, त्यांची आजी अत्यंत हजरजबाबी होती असे ते सांगत आणि हाच गुण त्यांच्यात उतरला. पुढे शिक्षणासाठी म्हणून ते पुण्यात आले. तिथे राम गणेश गडकरी यांच्या सारख्या प्रतिभावंत आसामिशी त्यांचा संबंध आला. गडकरी तापट स्वभावाचे असून देखील ते त्यांच्या जवळ बसून रहात; अगदी हाकलून देई पर्यंत बसत. गडकरींनी अत्रे यांची साहित्य विषयक आवड बघून त्यांना मार्गदर्शन सुरू केले. सुरवातीला आपले प्रेमसंन्यास हे पंचअंकी नाटक वाचायला दिले. त्यातली प्रतिभा बघून अत्रे अगदी भारावून गेले. पुढे गडकऱ्यांनी त्यांना, ‘घ्या हा मॉलिअर वाचा, हा हाजीराम केजीराम वाचा’ असं सांगून बरेच मार्गदर्शन केले. गडकरी त्यांना घेऊन पुण्यात फिरत. या काळात अत्रेंनी निरीक्षण कला शिकून घेतली आणि मनाच्या देव्हाऱ्यात गडकरींना गुरुस्थानी जागा दिली!
    १९२० पर्यंत गडकरी व बालकवी हे जग सोडून गेले आणि मराठी काव्यविश्व पोरकं होऊन गेलं. अशा वेळी माधव ज्युलियन यांच्या नेतृत्वाखाली सात आठ जण मिळून ‘रविकिरण मंडळ’ची स्थापना झाली. परंतु त्यातील अनेक त्रुटी, पारशी भाषेचा आत्यंतिक प्रभाव ह्या बाबी कुठे तरी तांदळात आढळणाऱ्या खड्या सारख्या लागत होत्या. ह्या खड्यांमुळेच १९२२ रोजी अत्रेंचा झेंडूची फुले हा विडंबन काव्यसंग्रह निर्माण झाला. पुढे चार वर्षांनी १९२५ साली झालेल्या शारदोपासक संमेलनात आग्रहास्तव याचे पहिले जाहीर वाचन झाले आणि प्रेक्षकांच्या हसून हसून मुरकुंड्या वळल्या. याच काळात १९२७ रोजी गडकरी जयंती निमित्त प्र के अत्रे यांचे पहिले जाहीर भाषण झाले आणि एक उत्तम वक्ता मराठीला आंदण म्हणून मिळाला! या भाषणाची सुरवात देखील ‘कालच गडकरी माझ्या स्वप्नात आले होते, त्यांनीच मला तुमचे आभार मानायला सांगितले’ अशी करून पहिल्या वाक्याला टाळी घेतली. पुढे ते लंडनहुन TD ही पदवी घेऊन आले. ज्याचा फायदा त्यांना पुढे नवयुग वाचनमालेत झाला. १९३७ रोजी ते नगरसेवक म्हणून पुणे म न पा मध्ये निवडून गेले व तिथे त्यांची चेअरमन पदी नियुक्ती झाली! ह्याच महापालिकेने त्यांना खूप विनोद शिकवला असे ते म्हणत! इतक्या वर्षात हा वल्ली विडंबन कवी म्हणून नावारूपाला आलेला होता.
    नाटक हा अत्रेंच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. ते स्वतः नाटकी, खट्याळ असल्याने त्यांची नाटके देखील तशीच आहेत. १९३६ साली लिहलेले साष्टांग नमस्कार हे समाजातील वेडं गोळा करून लिहलेले नाटक! या नाटकाने हास्याचे उचांक मोडले. पुढे ब्रह्मचारी, ब्रॅण्डीची बाटली, मोरूची मावशी, भ्रमाचा भोपळा अशी बरीच विनोदी नाटके त्यांनी लिहली. या सोबतच घराबाहेर, लग्नाची बेडी, तो मी नव्हेच अशी सामाजिक बांधिलकी जपून त्यातील अन्यायाला वाचा फोडणारी नाटके देखील लिहली. ‘चांगुणा’ ही सगुणा नावाच्या एका अभागी स्त्री वर लिहलेली छोटी कादंबरी! यात थोडाही विनोद नसून पूर्णपणे करुणरसाने ही कादंबरी भरली आहे. अत्र्यांची नाटके ही जनसामान्यांना रुचेल अश्या भाषेत आहेत. त्यात फारशी अलंकारिक भाषा नाही की कुठे दिखावा नाही. साधे लिखाण, बोलकी भाषा यातून सुद्धा मार्मिक विनोद त्यांनी साधलेला आहे. हे वैशिष्ट्य म्हणावं लागेल.
    आचार्य अत्रे हे नाव म्हटलं की त्यांनी जीवनात खेळलेले वाद ओघाने आलेच. अगदी मामा वरेरकर, श्री मा माटे, ना सि फडके यांच्या पासून ते शेवटचा वाद म्हणजे ठाकरे विरुद्ध अत्रे इथपर्यंत त्यांची समयरेखा आहे. या गाजलेल्या वादातुन त्यांना विनोद बुद्धीने अजेय ठरवले. आणि त्या विनोदी भाषेमुळेच ते हास्यसाम्राट झाले. एकदा १९४४ साली धुळे जिल्ह्यात मराठी साहित्य संमेलन भरवले होते. मामा वरेरकर त्याचे अध्यक्ष होते. आणि त्या संमेलनाच्या कमिटी मध्ये अंदाधुंद कारभार माजला होता. आचार्य अत्र्यांना निमंत्रण दिले गेले नाही. परंतु अचानक एका साप्ताहिकातून अस्सल धुळेकर या नावाने लेख येऊ लागले आणि त्या संमेलनापेक्षा लोकांचे त्या लेखन मालिकेकडेच जास्ती लक्ष गेले. ह्या अस्सल धुळेकराने त्या संमेलनाची इत्यंभूत माहिती फोडायला आणि झोडायला सुरवात केली. त्यात जोडीला विनोदाची फोडणी देखील दिली होती. हा अस्सल धुळेकर दुसरा तिसरा कोणी नसून आचार्य अत्रे होते! त्या वर्षीचे ते संमेलन पुण्यात बसून अत्र्यांनी गाजवले.
    १९४० साली आचार्य अत्रेंनी नवयुग वाचनमाला काढली आणि शैक्षणिक अभ्यासक्रम कसा असावा याची रेकॉर्ड ब्रेक नोंद केली. आजवर असा अभ्यासक्रम कोणालाही जमलेला नाही! अभ्यास सोप्पा करण्याच्या नादात त्यातलं वाङ्मय विसरता कामा नये या उक्तीवर त्यांनी भर दिला. पुढे संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाल्यावर जनतेच्या पाठिंब्याने ‘मराठा’ हे दैनंदिन वृत्तपत्र सुरू केले. आज देखील लोक संयुक्त महाराष्ट्र झाला तो अत्रे यांच्या घणाघाती भाषणांमुळे असे म्हणतात. आयुष्याच्या उत्तर काळात कर्हेचे पाणी या नावाने पाच खंडांचे आत्मचरित्र लिहले. आयुष्यात जगलेल्या अनेक खेळींचे प्रहार या आत्मचरित्रात उमटलेले आहेत. जगातली प्रत्येक गोष्ट आपणास यायला हवी ह्या विचारांचा हा माणूस! जेवढा अंगाने धिप्पाड तितकाच मनाने मोठा! माफी देण्याचे वस्त्र तर ते डोक्याला बांधूनच हिंडत! जीवनमार्गात मांडलेल्या पटांचा खेळ हसत हसत खेळून तो अगदी मुक्त उपभोगला! त्यात कधी हार आली कधी जित! पण तिकडे त्यांचं लक्षच नव्हतं! विनोदाची लहर मात्र सारखी अंगातून विजेसारखी भिने! असाच एक खेळ १३ जून १९६९ रोजी नियतीने त्यांच्याशी खेळला! हा शेवटचाच खेळ! ते हरले! आणि सतत हसवणारा हा बाबुराव अत्रे संबंध महाराष्ट्राला रडवून गेला!
    सूर्य आणि त्याच्या किरणांचा जितका दृढसंबंध तितकाच संबंध अत्रे आणि त्यांची भाषणे यांचा करता येईल; कारण ती किरणे विरोधी पक्षाला पोळून काढत; अगदी नामोहरम करीत! तर इकडे श्रोत्यांना प्रकाशाचे दान पण देत. हे दान पण अगदी निखळ असे! कारण यातून हास्याचा खळखळाट ऐकू येई. भाषण करण्याची ढब अत्र्यांच्या कडून बऱ्याच मोठमोठ्या लोकांनी उचलली. पण अत्र्यांनी त्याचा अभ्यास केला होता. थोरामोठ्यांची भाषणे त्यांनी ऐकली होती. विष्णुशास्त्री चिपळूणकर कसे मुद्देसूद बोलतात, गडकरी कसे विनोद करतात, अच्युतराव कोल्हटकर कसे खिळवून ठेवतात, लोकमान्य टिळक कसे बघतात, त्यांचा प्रभाव वाणीतुन कसा प्रकट होतो, या सर्वांचा अभ्यास केल्यावर ही भाषणाची लकब त्यांना आत्मसात झाली होती. भाषण करताना लागणाऱ्या प्रसंगावधान, अभ्यास, विनोदबुद्धी, आत्मविश्वास या सर्व गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या होत्या. विनोदाचे तंत्र त्यांनी विकसित केले, जितकं बोलायचं तितकंच बोलून काही इंचच टाळी घेण्याची कला त्यांच्या कडे होती. असेच एकदा अत्र्यांचा सत्कार होत असताना त्यांच्या बद्दल एक वक्ता बोलला की अत्र्यांचा विनोद खूप छान आहे वगैरे पण ते सगळ्यांची बिन पाण्याची करतात. लगेच मागे खुर्चीवर बसलेले अत्रे उठून बोलले, “अस नाही बर का, कधी कधी मी पाणी वापरतो”. अत्रेंनी विनोद करताना जास्ती अलंकार वापरले नाहीत कारण ‘जो मराठी बोलतो, तो मराठी माणूस’ इतक्या साध्या विचारांचा हा माणूस! त्यामुळे सर्वसामान्य माणसाला त्यांचे विनोद कळत. लेखन करताना विडंबन आणि अतिशयोक्ती यांचा भरपूर वापर केला. त्यांचे नाट्यलेखन विनोद प्रहसना मुळे गाजले. पण त्यापेक्षा त्यांनी वाद आणि भाषणे जास्ती गाजवली. अत्रेंचा विनोद चांगला होताच पण तो खट्याळ जास्ती होता, रोजच्या जीवनातील बोलले जाणारे व्यंग त्यात होते. साहित्यिक मुलामा पेक्षा साध्या दगड विटांनी तो उभारला होता. या इमारतीला सजवण्याचे, रंगवण्याचे काम केले ते पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांनी!

(क्रमशः….)
    

मराठी विनोदी साहित्याचा पहिला आधारस्तंभ: राम गणेश गडकरी



  मानवाच्या विविध जीवनरसातील एक महत्वाची रसनिष्पत्ती म्हणजे विनोद! अनेक दुःखांच्या डोंगरात विविध छटांनी वाहिलेल्या ह्या हास्यरसाच्या नद्या मानवीय जीवनाला हलका आधार देऊन जातात. यांच्या अस्तित्वाने सुखाची गंगोत्री नक्कीच कुठे तरी सापडेल या आशेवर माणूस तग धरून राहतो. हे रस कधी बैठकांच्या स्वरूपात दिसून येतात, कुठे महाविद्यालयाच्या कट्ट्यावर पाहण्यास मिळतात, तर कधी साध्या साध्या प्रसंगातून यांचे तुषार मनाला मोहरून जातात.


    परंतु भारतात हे रस फक्त जीवन विषयक तत्वाकडेच अडकले होते. त्यांना साहित्यिक ओंजळीची उपासना कोणी दिली नव्हती. त्याची सुरवात काहीश्या प्रमाणात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी केली. मात्र या विनोदरसाची गंगोत्री निर्माण करणारा खरा भगीरथ म्हणजे राम गणेश गडकरी! विनोदी साहित्याचा पहिला आधारस्तंभ! गडकऱ्यांना मराठी भाषेतील ‘शेक्सपियर’ म्हणतात. आणि ते खरेच आहे. या अवलियाने आपल्या समग्र वाङ्मयातून अनेक गड सर करून दिले आणि त्यावर इतरांनी मराठी विनोदी लेखनाचे साम्राज्य उभे केले.

    राम गणेश गडकरी हे नाव आज १०० वर्षांनी देखील स्मरणात आहे. अवघ्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी विपुल लेखन मराठी भाषेला दिले. त्यांच्या लेखणीतून निघालेले प्रत्येक अमृततुल्य शब्द आज सुद्धा त्यांच्या त्यावेळच्या सामाजिक भानाची, जाणिवेची आठवण करून देतात. गडकऱ्यांचा जन्म, २६ मे १८८५ रोजी नवसार, मुंबई प्रांत (आजचा गुजरात) येथे झाला. लवकरच १८९२ ला वडिलांचे निधन झाले व त्यांचे कुटुंब पुण्यात वास्तव्याला आले. शालेय शिक्षण झाल्यावर ते फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेताना किर्लोस्कर नाटक मंडळींच्या नाटकातले आवाज त्यांच्या कानी पडले आणि त्यांचा वावर तिकडेच जास्त वाढू लागला. कमवण्यासाठी ते तिथेच काम करु लागले. जोडीला नाटकांचा अभ्यास चालू केला. वयाच्या १९ व्या वर्षी ज्या व्यक्तीला धड मराठी बोलता येत नव्हते, ती व्यक्ती नरा चा नारायण व्हावा तशी मराठी भाषेच्या पदस्पर्शाने पावन होऊन निघाली. इंग्रजी, संस्कृत इत्यादी भाषेतील पौराणिक, आधुनिक भाषा व नाट्य यांचा सुद्धा अभ्यास त्यांनी केला आणि या सर्व भांडवलावर १९१२ साली प्रेमसंन्यास हे नाटक लिहून पूर्ण झालं! या नाटकाला भाषिक सौंदर्याचा उत्कृष्ठ नमुना असंच म्हणावं लागेल. त्यांचे शिष्य आचार्य अत्रे यांना पण साहित्याची गोडी या नाटकामुळे लागली असे ते म्हणत. राजसंन्यास वाचून तर खुद्द त्यांच्या गुरूंनी, म्हणजे कोल्हटकरांनी तर “मी जर शिक्षण मंत्री असतो तर हे नाटक प्रत्येक शाळा-कॉलेजमध्ये अभ्यासाला ठेवले असते” असे उद्दगार काढले!

    तशी गडकऱ्यांना १८ नाटके लिहायची होती.पण अवघ्या ९ वर्षात त्यांनी प्रेमसंन्यास, भावबंधन, पुण्यप्रभाव व एकच प्याला ही पूर्ण नाटके तर वेड्यांचा बाजार, गर्वहरण, राजसंन्यास ही तीन अपूर्ण नाटके लिहिली. या जोडीला वाग्वैजयंती नावाचा कविता संग्रह गोविंदाग्रज हे टोपणनाव वापरून लिहला. शिवाय बाळकराम या नावाने इतर स्फुटलेख, कथा हे चालू होतंच. ठकीचे लग्न या कथेने तर त्या काळी हास्य कल्लोळ उडवून दिला होता. पण हे कार्य ही अपूर्णच राहून गेले. लहान मुलांच्या साठी दोन बालनाट्ये आणि काही इसापनीतीच्या कथा प्रसिद्ध केल्या. यांचे विशेष म्हणजे या कथेत एकही जोडाक्षर त्यांनी वापरले नाही! या महर्षीचा मृत्यू वयाच्या अवघ्या पस्तीसाव्या वर्षी, २३ जानेवारी १९१९ रोजी झाला. मराठीला ईश्वराने दिलेला हा हिरा त्यांच्याच अंगी असलेल्या स्वभाव हट्टी गुणाने हिरावून घेतला. माधवराव पेशवे गेल्याने जे मराठा साम्राज्याचे नुकसान झाले तेच मराठी भाषेचे या व्यक्तीच्या अचानक निधनाने झाले. दिलेले दान पुरेसे पडण्याआधीच ईश्वराने आपला हात काढून घेतला होता.

    गडकऱ्यांचे लेखन अनुप्रास अलंकाराने बहुत नटले होते. वाक्यरचनेच्या रुपात त्यांनी विविध नाट्यरंग अगदी भरून काढले होते. “प्रेमात राजा गुलाम होतो, पण दारू पिल्यावर गुलाम देखील राजा सारखा वागू लागतो” हे एकच प्याला नाटकातील अजरामर वाक्य कोण विसरेल? याच नाटकातून त्यांनी उभा केलेला तळीराम हा सर्वसामान्य लोकांच्यात वावरणारा तळीराम आहे, हे नाकारून चालेल का? “मुलीने उंबरठा ओलांडल्या दिवसापासून बापाने दारा बाहेर पडायचे बंद केले आहे” या वाक्यातून विनोदीच पण करुण रसाने भरलेल्या त्या काळच्या बापाची कैफियत त्यांनी प्रेमसंन्यास या नाटकात दाखवली आहे. गडकऱ्यांचा विनोद पूर्णतः निखळ होता. ते जेवढं लिहीत त्या पेक्षा त्यांचं बोलणं जास्त विनोदी होत. प्रेमसंन्यास मधील विसरभोळा गोकुळ तर सगळ्यांच्या तोंडी असेल आजही! आजकाल आपण ज्याला PJ का काय म्हणतो त्याचा उगम देखील गडकऱ्यांनी केलेला आहे असं म्हटलं तरी वावग नाही ठरणार! कारण त्यांनी वेड्यांचा बाजार मधील बळवंत नाटक मंडळीमध्ये काम करणारा देशपांडे नावाचा गृहस्थ अशाच प्रकारच्या PJ नी रंगवलेला आहे. गडकरी हे किर्लोस्कर नाटक मंडळी चे कडवे निष्ठावंत. पुढे काही वादामुळे गंधर्व नाटक मंडळी वेगळी झाली आणि त्यांनी स्वतःची नाटक कंपनी स्थापन केली! पाहिलं नाटक गाजल्यावर बोडस येऊन गडकऱ्यांना चिडवून लगेच म्हणाले, “मास्तर, आमच्या कंपनीचा नारळ फुटला बर का!” गडकरी पण लगेच उत्तरले, “नारळ फुटला आता कंपनी केंव्हा फुटणार?”. असा त्यांचा विनोद होता. उदाहरणे बरीच आहेत. पण गडकरी स्वभावाने फटकळ! पटकन बोलून जायचे त्याचे स्वरूप त्यांच्या ध्यानी नसायचे, विनोद त्यांनी आणला खरा परंतु त्याचा तंत्र शुद्ध अभ्यास मात्र त्यांचे शिष्य आचार्य अत्रे अर्थात प्रल्हाद केशव अत्रे यांनी केला.
(क्रमशः….)

मनोगत

मनोगत....

       आजपासून मी माझा वैयक्तिक ब्लॉग सुरू करत आहे. वास्तविक ब्लॉग ला प्रस्तावना लिहावी की नाही ह्यावर थोडा संभ्रमित होतो. परंतु मसुदा कोणताच पक्का नाही आणि त्यावर पूर्वग्रहित संरचना धरून प्रस्तावना लिहणे मनाला कुठेतरी पटत नव्हतेच. म्हणून सरळ मनोगत लिहावे ह्या विचारावर मी येऊन थांबलो.

       खरंतर बऱ्याच दिवसांपासून काही मित्र, आप्त स्वकीय मी ब्लॉग लिहावा असे सुचवले होते. पण स्वतःची अपूर्णता व मनाची तितकी तयारी नसल्याने ते मी करायला तयार नव्हतो. एकदा घडी बसली की मग श्रीगणेशा करावा ह्या विचारात ब्लॉग लिहण्याचा विचार मी सोडून दिलेला होता. मात्र गेल्या तीन चार महिन्यापासून हातातील लेखणीचा कागदाला काही तरी उपयोग व्हावा अस सारखं वाटत होतं! त्यातून काही सुचलेले शब्द सोशल मीडियावर पडत होते, काहींनी ते उचलून देखील धरले. पण या सगळ्यात हातातील मोरपिसाची तहान भागेना, आणि त्याची भूक म्हणून हा ब्लॉग नावारूपाला येत आहे!

       'रिकामटेकडेपणाचे उद्योग' हे नाव मला राम गणेश गडकऱ्यांच्या 'रिकामटेकडेपणाची कामगिरी' यावरून सुचलं. साहित्यात त्यांचे स्थान माझ्याकरिता अत्यंत आदराचे आहे. अनुप्रासा ने नटलेले त्यांचे भाषिक सौंदर्य माझ्या मनाला खूप भावलेले आहे. विनोदात अत्रे, पु ल देशपांडे ह्या वल्ली अजरामर आहेत. काव्य क्षेत्रात ग्रेस माझे आवडते, तरीही माडगूळकर, बोरकर, पाडगावकर यांना मनात विशेष स्थान आहे. या सर्वांनी दिलेले भांडवल जे थोडेबहुत माझ्या अंगवळचणीला पडले आहे त्यातून ह्या उद्योगांचे पाढे मला सुचत आहेत.

       ह्या ब्लॉग मध्ये माझे विचार, सुचलेल्या कथा, कविता, सांगावे वाटणारे शब्द व लेख, काही अनुभव आदी गोष्टी मी मांडणार आहे, ते समाधानासाठी! यातून कोणत्याही व्यक्ती किंवा समाजाला अहितकारक बोलण्याचा उद्देश आजिबात नाही. वाचकांनी यांतील बाबींवर अभिप्राय कळवावेत एवढी एकच माफक अपेक्षा ठेऊन मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की माझ्या ह्या लेखणीला कधी पूर्णविराम न मिळो!

आपला विनम्र,
अनय सखदेव 





इस्लाम आणि लव जिहाद

लव्ह जिहाद! यावर बोलण्याआधी सर्वप्रथम जिहाद समजून घ्यायला हवा. जिहाद हे एक धार्मिक युद्ध आहे. सोप्या भाषेत सांगायच तर "इस्लाम कबूल करण्...